जिओने जोडले सर्वाधिक ‘सक्रिय ग्राहक’ - ट्राय

 जिओने जोडले सर्वाधिक ‘सक्रिय ग्राहक’ - ट्राय




एअरटेलने १३ लाख, तर व्होडाफोन आयडियाने ३१ लाख ‘सक्रिय ग्राहक’ गमावले

बीएसएनएलमध्ये मंदीचे संकेत

वायरलाइन ब्रॉडबँड ग्राहकसंख्या ४ कोटी ३६ लाखांच्या पार

मुंबई २५ सिटी न्यूज नेटवर्क 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या ताज्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओ ‘सक्रिय ग्राहक’ जोडण्यात आघाडीवर आहे. सप्टेंबर महिन्यात जिओने सुमारे १७ लाख ‘सक्रिय ग्राहक’ जोडले. त्याच कालावधीत भारती एअरटेलने १३ लाख, तर व्होडाफोन आयडियाने (व्हीआय) सुमारे ३१ लाख ग्राहक गमावले. ‘सक्रिय ग्राहक’ जोडण्यात जिओ सलग दुसऱ्या महिन्यात पहिल्या क्रमांकावर राहिले. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या ‘सक्रिय ग्राहक’ संख्येत घट झाल्यामुळे सप्टेंबर महिन्यात संपूर्ण उद्योगातील सक्रिय ग्राहकसंख्या १५ लाखांनी घटून सुमारे १०६ कोटींवर पोहोचली आहे.


दूरसंचार कंपन्यांचे कामगिरी त्यांच्या सक्रिय ग्राहकसंख्येवर अवलंबून असते, कारण सक्रिय ग्राहक हा कंपन्यांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतो. मात्र, सप्टेंबर महिन्यात संपूर्ण उद्योगाला धक्का बसला. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने एकूण १ कोटी ग्राहक गमावले, म्हणजे १ कोटी सिम बंद झाले. टॅरिफ वाढल्यानंतर, दुहेरी सिमची गरज नसलेल्या ग्राहकांनी त्यांचे नंबर बंद केले, असे मानले जात आहे.


बीएसएनएलच्या बाजारातील हिस्स्यात किरकोळ वाढ झाली. या सरकारी कंपनीने सप्टेंबरमध्ये सुमारे १५ लाख वायरलेस डेटा ब्रॉडबँड ग्राहक जोडले, परंतु जुलै आणि ऑगस्टच्या ५६ लाखांच्या सरासरीपेक्षा हा आकडा खूप कमी आहे. शिवाय, बीएसएनएलने सहा सर्कल्समध्ये ग्राहक गमावले, ज्यामुळे अलीकडील वाढीनंतर मंदीचे संकेत मिळाले.


ट्रायच्या आकडेवारीनुसार, वायरलाइन ब्रॉडबँड, म्हणजे फायबर व अन्य वायरलाइन जोडणी असलेल्या ग्राहकांची एकूण संख्या ४ कोटी ३६ लाखांवर गेली आहे. सप्टेंबर महिन्यात यात ७ लाख ९० हजार नव्या ग्राहकांची भर पडली. यामध्ये सर्वाधिक ग्राहक रिलायन्स जिओने जोडले. जिओने सप्टेंबरमध्ये ६ लाख ३४ हजार ग्राहक जोडले, तर एअरटेलने केवळ ९८ हजार ग्राहक जोडले. त्यानंतर जिओ आणि एअरटेलच्या बाजारातील हिस्सेदारी अनुक्रमे ३२.५% आणि १९.४% झाली. त्याच कालावधीत बीएसएनएलने ५२ हजार वायरलाइन ब्रॉडबँड ग्राहक गमावले.

Comments