_मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ 1000 हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधी एकवटणार: कोल्हापूर जिल्ह्यातून 50 मंदिर प्रतिनिधी जाणार
_मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ 1000 हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधी एकवटणार: कोल्हापूर जिल्ह्यातून 50 मंदिर प्रतिनिधी जाणार_
शिर्डी येथे 24 व 25 डिसेंबरला तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्धस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आज मात्र भारताने ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांचा भ्रष्टाचार, पैसे घेऊन ‘व्ही.आय.पी.’ दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे, ‘वक्फ बोर्ड’चे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण चालू आहे. अशा वेळी मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे हे हिंदु समाजाचे दायित्व आहे. एकूणच मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणार्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी श्री साई पालखी निवारा, नाशिक; श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान; श्री जिवदानी देवी संस्था, मुंबई; हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 24 आणि 25 डिसेंबर 2024 या दिवशी शिर्डी (नगर) येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून 1,000 हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 50 मंदिरांचे प्रतिनिधी जाणार आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील यांनी दिली आहे.
मंदिर परिषदेसाठी सहभागी होणार्या मंदिरांमध्ये प्रामुख्याने जोतिबा देवस्थानचे हक्कदार आणि वतनदार पुजारी श्री. रणजित चौगुले, गडहिंग्लज परिसरातील लखमेश्वर मंदिराचे खजिनदार श्री. शाम गुरव, मलकापूर येथील श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील, निळकठंश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. उदयसिंह कोकरे-देसाई, टोप येथील श्री बीरदेव मंदिराचे विश्वस्त श्री. पांडुरंग पुजारी, पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिराचे विश्वस्त श्री. नवलू खुळे, ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’चे अध्यक्ष निखील मोहिते, पाचगाव येथील श्री भैरवनाथ मंदिराचे विश्वस्त श्री. कृष्णात गाडगीळ, श्री नृसिंह देवस्थान ट्रस्ट सांगवडे येथील विश्वस्त श्री. आप्पासाहेब गुरव, तळंदगे येथील श्री जगन्नाथ मंदिराचे परंपरागत पुजारी श्री. गणेश कदम, उत्तरेश्वर मंदिराचे माजी सचिव श्री. सुभाष सुर्वे, टेभलाईदेवी देवस्थानचे पुजारी श्री. सूर्यकांत गुरव, श्री उजळाईवाडी देवस्थानचे विश्वस्त श्री. अशोक गुरव यांचा समावेश आहे.
परिषदेत चर्चा होणारे विषय
या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
Comments
Post a Comment