तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील
पाचगाव येथे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यू’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या मातीत मिसळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली सामाजिक बांधिलकी भविष्यात सुसंस्कृत समाज घडवेल आणि त्यातूनच समृद्ध गावाचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन पाचगावच्या सरपंच सौ. प्रियांका संग्राम पाटील यांनी केले.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पाचगाव येथे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
सरपंच पाटील म्हणाल्या, केवळ वर्गातील चार भिंतींमध्ये शिक्षण पूर्ण होत नाही. समाजातील अडीअडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे हेच खरे शिक्षण आहे. या शिबिरातील स्वच्छता अभियान व ग्रामसंवादातून विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे महत्त्व ओळखले आहे. ‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी पाचगावचे ग्रामस्थ आणि विद्यापीठाचे विद्यार्थी खांद्याला खांदा लावून काम करतील.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सांगितले की, विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी समाजसेवेला आपले आद्य कर्तव्य मानतात. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी हे तरुण राष्ट्रसेवक म्हणून सदैव तत्पर राहतील.
मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा म्हणाले, ग्रामविकासासोबतच आरोग्य साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती, स्वच्छतेबाबत प्रबोधन करून ‘आरोग्यसंपन्न गाव’ घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले.
या विशेष शिबिरात श्रमसंस्कार, ग्रामविकास आणि सामाजिक बांधिलकी यांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम, ग्रामसंवाद तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी उपसरपंच दिपाली प्रकाश गाडगीळ, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील, विद्यामंदिर शांतीनगरच्या मुख्याध्यापिका मंगल देवठाणेकर, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. अद्वैत राठोड, डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. जगन्नाथ शेटे, स्वयंसेवक, प्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Comments
Post a Comment