महाराष्ट्रातील आशा वर्कर्स यांना शासनाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळणेकरीता, शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

 महाराष्ट्रातील आशा वर्कर्स यांना शासनाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळणेकरीता, शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी



कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क 

सेवाभावी वृत्तीने कार्य करीत असलेल्या राज्यातील आशा वर्कर्सना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रम लागू करावेत यासाठी, शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशा आशयाचे  निवेदन राज्य गुणवंत कामगार असो.च्या वतीने कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना लेखी स्वरूपात देण्यात आले.

राज्यातील ग्रामीण व शहरी भागात समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या आशा वर्कर्स ज्यांनी, कोरोना काळात आपले भरीव व महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या कर्मचाऱ्यांना शासकीय कल्याणकारी प्रवाहात सामील होता येत नाही. यासाठी राज्य शासनाने सर्व आशा वर्कर्सना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळणेकामी शासन स्तरावरती धोरणात्मक निर्णय घ्यावा, जेणेकरून सातत्याने तुटपुंज्या मानधनावरती सेवाभावीवृत्तीने कार्य करणाऱ्या राज्यातील सर्व आशा वर्कर्स व त्यांच्या कुटुंबियांची सर्वार्थाने प्रगती साधली जाईल.

महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही शासनाची स्वायत्त संस्था असून, या संस्थेच्यावतीने एस.टी. महामंडळ, सर्व सहकारी बँका, एम.एस.ई.बी., एल.आय.सी, जीवन प्राधिकरण, धर्मादाय ट्रस्ट, सर्व मोठी हॉस्पिटल्स, साखर कारखाने, वाहतूक संस्था, अशाप्रकारे अधिनियम 1948 अंतर्गत येणारे सर्व कारखाने तसेच BOMBEY SHOP AND ESTABLISHMENT ACT 1948 अंतर्गत येणारी सर्व दुकाने व अस्थापना, मोटर वाहतूक कायद्यांतर्गत येणारे कामगार अशा प्रकारे, ज्या संस्थेमध्ये पाच पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत अशा संस्थेतील कामगार, मालक व शासन यांच्या त्रिपक्षीय अंशदान निधीच्या माध्यमातून मंडळाकडे निधी जमा होत असतो. या मंडळाच्या माध्यमातून विविध जयंती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्याचबरोबर शैक्षणिक शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती, विदेशी भाषा संभाषण व लेखन प्रशिक्षण वर्ग, पाठ्यपुस्तक सहायता योजना, एमएससीआयटी अनुदान योजना, दिव्यांग शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती, असाध्य रोग उपचार सहायता योजना, अपघातात विकलांग कामगारास आर्थिक मदत, मोटर वाहन प्रशिक्षण योजना, आत्महत्याग्रस्त कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, साहित्य प्रकाशन अनुदान योजना, महिला शिवण वर्ग प्रशिक्षण योजना, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, कामगार नाट्य प्रशिक्षण, मैदानी व बैठे खेळ स्पर्धा, कामगार सहली, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथालय, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार व कामगार भुषण पुरस्कार अशा अनेक कामगारभिमुख योजना व उपक्रम राबवून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीसाठी अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत,

सध्या या मंडळाच्यावतीने अनेक शासकीय महामंडळाच्या कामगार वर्गाला लाभ दिला जातो, त्याच धर्तीवर राज्यातील आशा वर्कर्सना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळावा यासाठी, आपण शासनस्तरावरती धोरणात्मक निर्णय होणेकामी प्रयत्न करावेत व संबंधित घटकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी सदर मागणीच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत शासकिय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबतीत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे, अशी माहिती असो.चे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

यावेळी संजय सासने, भगवान माने, सुभाष पाटील, संभाजी थोरात, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, मुनीर मुल्ला आदी. सहकारी उपस्थित होते.

Comments