रजनीश जैन यांच्या ‘क्वाएट एक्सलन्स’ पुस्तकाचे प्रकाशन; नेतृत्व आणि जीवनमूल्यांवर भर
नवी दिल्ली ०२ सिटी न्यूज नेटवर्क
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष (प्रेसिडेंट) आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) रजनीश जैन यांच्या ‘Quiet Excellence: 52 Reflections on Work, Faith and What Truly Matters’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर (IIC) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्योग, शिक्षण, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
ओम बुक्स इंटरनॅशनलतर्फे प्रकाशित करण्यात आलेले हे पुस्तक जीवन, नेतृत्व, श्रद्धा आणि दैनंदिन अनुभवांमधून मिळालेल्या 52 अर्थपूर्ण शिकवणी, विचार आणि अनुभवांचा संग्रह आहे. जीवनातील आणि व्यावसायिक यशातील मोठ्या निर्णयांइतकाच दैनंदिन सवयी, मानवी संवेदनशीलता आणि मूल्यांचाही महत्त्वाचा वाटा असतो, यावर या पुस्तकात विशेष भर देण्यात आला आहे.
यावेळी रजनीश जैन म्हणाले, “आपला समाज आणि आपला देश नेहमीच सखोल सामूहिक जाणीवेने प्रेरित राहिला आहे. हीच सामूहिक जाणीव आपल्याला महत्त्वाकांक्षा आणि नम्रता, कृती आणि चिंतन तसेच यश आणि जीवनाचा खरा अर्थ यांच्यात समतोल राखण्यास मदत करते. भारताच्या या व्यापक सामूहिक जाणीवेचा एक छोटासा भाग जरी हे पुस्तक बनू शकले, तरी माझा हा प्रयत्न खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याचे मला वाटेल.”
क्वाएट एक्सलन्स हे केवळ वाचनासाठीचे पुस्तक नसून ते जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करणारे पुस्तक आहे. यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले छोटे अनुभव आणि शिकवणी वाचकांना त्यांच्या कामाकडे, विचारांकडे आणि नातेसंबंधांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास प्रेरित करतात.
या पुस्तकामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा संदेश तसेच विविध प्रतिष्ठित व्यक्तींचे विचार समाविष्ट करण्यात आले आहेत. आत्मपरीक्षण, सजगता, मूल्याधिष्ठित जीवन आणि संतुलित जीवनशैलीचे महत्त्व या संदेशांमधून अधोरेखित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) कार्यरत राहिलेले ज्येष्ठ राजनयिक आणि माजी राजदूत डॉ. दीपक व्होरा उपस्थित होते. तसेच दिल्ली सरकारचे माजी मुख्य सचिव नरेश कुमार, ब्रह्माकुमारीजच्या बीके आशा दीदी, ICMAI चे अध्यक्ष सीएमए टीसीए श्रीनिवास प्रसाद आणि HFCL चे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र नाहटा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी सांगितले की, वेगाने बदलणाऱ्या आजच्या जगात नेतृत्वाची ओळख केवळ यश किंवा उपलब्धींनी होत नाही, तर संवेदनशीलता, मानवी मूल्ये आणि समाजाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातूनही ती घडते. क्वाएट एक्सलन्स हे पुस्तक याच विचारांना साध्या भाषेत आणि वास्तव जीवनातील अनुभवांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते.

Comments
Post a Comment