मोदींची १२ वर्षे म्हणजे राष्ट्रउभारणीचे महातप; भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : मा. शिवप्रकाशजी

 मोदींची १२ वर्षे म्हणजे राष्ट्रउभारणीचे महातप; भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : मा. शिवप्रकाशजी



कोल्हापूर, दि. १४ सिटी न्यूज नेटवर्क 

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त ‘प्रबुद्ध भारत संमेलन’ उत्साहात संपन्न झाले. हॉटेल वृषाली येथे आयोजित या संमेलनात भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. शिवप्रकाशजी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.



कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मा. शिवप्रकाशजी यांचा श्री अंबाबाईंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर, वकील, अभियंते आणि प्रबुद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मार्गदर्शन करताना मा. शिवप्रकाशजी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या १२ वर्षांचा कार्यकाळ हा केवळ सत्तेचा प्रवास नसून राष्ट्रउभारणीचे एक महातप आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राच्या आधारे भारताने जागतिक स्तरावर नवे स्थान निर्माण केले आहे.”

यावेळी त्यांनी “वसुधैव कुटुंबकम्” या भारतीय संस्कृतीच्या मूलमंत्राचा उल्लेख करत सांगितले की, “अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥” म्हणजेच संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे, ही भारताची जीवनदृष्टी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विचाराला जागतिक व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून दिली असून भारताची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट केली आहे.

ते पुढे म्हणाले की, जनसंघापासून भारतीय जनता पक्षाने ‘अंत्योदय’ हा विचार केंद्रस्थानी ठेवला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य मोदी सरकारने सातत्याने केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आहे.

महिला सक्षमीकरण आणि महिला सन्मानाच्या क्षेत्रातही मोदी सरकारने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, उज्ज्वला योजना, मातृत्व लाभ योजना, महिला स्वयं सहायता गटांना दिलेले बळ, तसेच महिलांसाठी संसद व विधानमंडळांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ यांसारख्या निर्णयांमुळे देशातील महिलांचा आत्मविश्वास आणि सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी कलम ३७० चे उच्चाटन, दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका आणि सशक्त संरक्षण व्यवस्थेचा उल्लेख केला. “एकेकाळी नक्षलवादामुळे प्रभावित असलेल्या अनेक भागांमध्ये आज विकासाची गंगा पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या ठोस धोरणांमुळे आणि सुरक्षा दलांच्या प्रभावी कारवाईमुळे नक्षलवादाचे जाळे मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले असून अनेक भाग नक्षलवादमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत,” असे शिवप्रकाशजी म्हणाले. तर आर्थिक आणि पायाभूत विकासाच्या क्षेत्रात महामार्ग, रेल्वे आधुनिकीकरण, डिजिटल क्रांती आणि आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली असली तरी देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्पष्ट आणि कालबद्ध ध्येय प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ठेवले आहे. ‘विकसित भारत २०४७’ हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून १४० कोटी भारतीयांचा राष्ट्रीय संकल्प आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला आर्थिक, सामाजिक, तांत्रिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जगातील अग्रगण्य राष्ट्रांच्या पंक्तीत नेण्यासाठी मोदीजी सातत्याने कार्यरत आहेत. प्रत्येक नागरिकाचा सहभाग, सुशासन, आत्मनिर्भरता आणि सर्वसमावेशक विकास यांच्या माध्यमातून हे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र सरकार नियोजनबद्धपणे काम करत आहे, असे शिवप्रकाशजी यांनी सांगितले.

इतिहासातील सांस्कृतिक पुनर्जागरणाचा संदर्भ देताना शिवप्रकाशजी म्हणाले की, सम्राट हर्षवर्धन आणि सम्राट चंद्रगुप्त यांच्यानंतर भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर गौरवशाली पुनर्स्थापना करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. राम मंदिर, काशी विश्वनाथ धाम, महाकाल लोक यांसारखे उपक्रम भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाची साक्ष देतात, असे त्यांनी नमूद केले.

भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ बनविण्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी समाजातील प्रबुद्ध, सुशिक्षित आणि विचारवंत वर्गाने शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.


याप्रसंगी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मा. शिवप्रकाशजी यांचा परिचय करून देत केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेल्या विविध विकासकामांची आणि उपलब्धींची माहिती उपस्थितांना दिली.


कार्यक्रमाच्या शेवटी खासदार धनंजय महाडिक यांनी आभार मानताना सांगितले की, मा. शिवप्रकाशजी यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या कार्याचा आढावा मांडला. या मार्गदर्शनातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे चित्र स्पष्ट झाले.


कार्यक्रमास भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. शिवप्रकाशजी, नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समरजितराजे घाटगे, कृष्णराज महाडिक, राहुल चिकोडे, योगेश बाचल, मुरलीधर जाधव, माधुरी नकाते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments