करवीर पीठात चातुर्मासास उत्साहाने सुरवात

सिटी न्यूज़
करवीर पीठात चातुर्मासास उत्साहाने सुरवात
कोल्हापूर येथील श्री स्वामी जगदगुरू शंकराचार्य पीठामध्ये मंगळवारी द्वैतखण्डनम या दुर्मिळ ग्रंथाचे प्रकाशन स्वामींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेजारी महापौर सौ. माधवी गवंडी, प्रकाश गवंडी, कार्यवाह शिवस्वरूप भेंडे, अनिरुद्ध जोशी आदी.
कोल्हापूर, ता. 16 – धर्मजागृतीसाठी चातुर्मासाचे व्रत आयोजित केले जाते, असे प्रतिपादन येथील श्री स्वामी जगदगुरू शंकराचार्य पीठाचे स्वामी श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज केले.

येथील पीठामध्ये आजपासून चातुर्मासास सुरवात झाली. त्यावेळी पादुका पूजनानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, शास्त्रसंकतेनुसार धर्माची उपासना करावी, असे शास्त्रसंकेत आहेत. यामध्ये वर्षभर सर्वत्र धर्मकार्यासाठी व धर्मप्रसारासाठी आम्ही जात असतो. मात्र या दोन महिन्यांच्या कालावधीत एकाच ठिकाणी राहून धर्मकार्य करावे. प्रवचन, कीर्तन, पूजा-अर्चा या माध्यमतून समाजाचे प्रबोधन करावे. आत्मद्धाराबरोबरच सर्व जगाच्या कल्याणासाठी नित्य नैमित्तिक पूजा करून सर्वांना मार्गदर्शन करणे हा प्रमुख उद्देश आहे.

दरम्यान, यावेळी व्यास पूजन, पादुका पूजन, आरती व स्वामींचे आशीर्वचन झाले. आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते पादुका पूजन झाले. श्री चण्डिकोपास्तिदीपिका ग्रन्थः व द्वैतखण्डनम या ग्रंथांचे प्रकाशन पूज्यनीय स्वामींच्या हस्ते झाले. यावेळी महापौर सौ. माधवी गवंडी, प्रकाश गवंडी, कार्यवाह शिवस्वरूप भेंडे, महेंद्र इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Comments