पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे, बिहारचे माजी राज्यपाल, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज (दि. ४ ऑगस्ट) कोल्हापूर येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षणविश्वासह सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि औद्योगिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य केले. महाराष्ट्रासह देशभरात त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था आणि आरोग्यसेवा प्रकल्पांमुळे त्यांचे नाव देशभर आदराने घेतले जाते. उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते.
त्यांनी बिहार राज्याचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. शिक्षण आणि समाजकारणातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविले होते.
डॉ. पाटील यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असून, त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त होत आहेत.
.jpeg)
Comments
Post a Comment